बाल शिवाजी शाळेत अविष्कार स्नेहसंमेलन उत्साहात
ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे श्री.सचिव मोहन गद्रे, कार्यकारणी सदस्या सौ. अनघा देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
सकाळच्या सत्राची सुरुवात ‘डम डम डम डम डमरू बाजे…’ ह्या गणपती बाप्पाच्या गाण्याने झाली फुलवाडी ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नृत्य सादर केली. भार्गवी कुलकर्णी व समर्थ ढोरे या वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम केले. दुपारच्या सत्राची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. वर्ग 4 ते 9 च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बहारदार नृत्य सादर केले. तसेच पर्यावरण रक्षणावर आधारित ‘Let’s sow oxygen’ ही इंग्रजी नाटिका तर ‘स्वप्नांच्या दुनियेत’ ही मराठी नाटिका सादर केली. वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘तांडव नृत्य’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमामध्ये 2023- 24 या सत्रातील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. अदिती तराळे, संस्कृती पाठक, रुजूता घोगरे, प्राप्ती पवार, राघवेंद्र देशमुख या विद्यार्थ्यांना मा. श्री बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक जिल्हा अकोला तसेच मा. डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य श्री. शिवाजी महाविद्यालय यांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील आदर्श विद्यार्थी म्हणून अंजली कराळे हिला मा. श्री. बच्चन सिंह यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
पालकांसाठी आयोजित ‘विद्यार्थी घडवितांना संस्कार रुजवण्याची जबाबदारी कोणाची’ या विषयावरील निबंध स्पर्धेत श्री. निलेश पाकदूने यांना प्रथम क्रमांक तर सौ. वृषाली भागवत यांना द्वितीय क्रमांक विद्या ठाकरे, सौ.अंजली शेटे, सौ. काजल मंडलिक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. वर्ग 6 ते 10 वीच्या पालकांसाठी ‘शिक्षणातील बदलत्या प्रवाहासाठी पालकांची तयारी’ या निबंधासाठी श्री. कौशिक पाठक यांना प्रथम क्रमांक तर सौ. वैशाली पाकदूने यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.त्याचप्रमाणे शिक्षक पालकांसाठी देखील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अ’ गट- ‘विद्यार्थी घडवितांना संस्कार रुजविण्याची जबाबदारी कोणाची’ या विषयाच्या निबंधामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस शिक्षिका सौ. रागिनी बक्षी तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शिक्षिका सौ. किरण झटाले तर ‘ब’ गट -‘शिक्षणातील बदलत्या प्रवाहासाठी पालकांची तयारी’ विषयावर निबंध लेखनात प्रथम क्रमांक शिक्षिका सौ. रेणुका भाले तर द्वितीय क्रमांक शिक्षिका सौ. अपेक्षा आवळे यांना प्राप्त झाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
