बाल शिवाजी शाळेच्या शिरपेचात आणखी एक हजेरी…चि. अर्णव भांबेरे अकोला विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत भारतातून दुसरा…

बाल शिवाजी शाळेतील इयत्ता 7 वीचा विद्यार्थी अर्णव रवींद्र भांबेरे याने विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) या राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान परीक्षेत संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक मिळवून अकोल्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचवला आहे. विशेष म्हणजे अर्णव हा हिमालयन मानांकन प्राप्त करणारा विदर्भातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशामुळे त्याची निवड ISRO (इस्रो)च्या बाल वैज्ञानिक सदस्यत्वासाठी करण्यात आली असून, त्याला वर्षभरात ISRO ला भेट देण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित केली जाते. 2024-25 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत संपूर्ण भारतातून तब्बल 1,25,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्यातून 4,880 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामधून फक्त 488 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली. विदर्भातील प्रत्येक इयत्तेतील (6वी ते 11वी) दोनच विद्यार्थी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, त्यात अर्णवने इयत्ता सातवीमधून आपले स्थान निश्चित केले.
या उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्णवला 15,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि ‘भास्कर स्कॉलरशिप’ अंतर्गत एक वर्षासाठी दर महिन्याला 2,000 रुपये या प्रमाणे 24,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. याशिवाय अर्णवची निवड IIT कानपूर येथे आयोजित विशेष वैज्ञानिक शिबिरासाठीही झाली आहे, जिथे प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष अनुभव, वैज्ञानिक सत्रे व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. याआधी होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत त्याने सिल्व्हर मेडल (रौप्य पदक) पटकावले आहे. अशा विविध स्पर्धा परीक्षांमधून मिळणारा अनुभव आणि मेहनत तसेच शाळेने उपलब्ध करून दिलेली विविध शैक्षणिक दालने याचे फलित म्हणून आज तो देशपातळीवर पोहोचला आहे. या यशामध्ये अर्णवला त्याचे पालक, शिक्षकवृंद, आणि बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका यांचेही मोलाचे योगदान राहिले. शाळेच्या वतीने अर्णवचा सत्कार करण्यात आला असून, अकोल्यात विविध ठिकाणी त्याचे अभिनंदन होत आहे. अर्णवचे हे यश आजच्या पिढीला विज्ञान क्षेत्रातील नव्या संधींची दारे उघडून देणारे ठरत आहे. बाल वयातच अशा दर्जेदार स्पर्धांमध्ये आघाडी घेतल्याने त्याच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळकट होईल आणि भविष्यात तो देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत मोठे योगदान देऊ शकेल.
अर्णवच्या कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अविनाश देव, संस्थेचे सचिव मा. श्री. विश्वनाथ गद्रे. कार्यकारणी सदस्या सौ. अनघा ताई देव, ब्राह्मण सभा कार्यकारणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या.